Tuesday, September 18, 2012

बदीउज्जमा 'खावर' यांची गझल (badiujjamaan khavar yanchi gazal) --- Amol Waghmare

                           बदीउज्जमान  खावर यांची गझल   
मराठीमध्ये बदीउज्जमान खावर हे एक महत्वाचे गझलकार मानले जातात.
'खावर' हा तखल्लुस (अर्थात कवीचे टोपण नाव) वापरून गझल लिहिणाऱ्या या कवीने मराठी गझलेला एका ठराविक साचेबद्धतेच्या पलीकडे घेऊन जाण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. सशक्त  काव्यनिर्मिती करून त्यांनी मराठी गझलेच्या परिभाषांना व्यापकत्व देण्याचा आणि मराठी गझलेचे आकाश विस्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.           

                    "तो रंग नाही राहिला, तो वास नाही राहिला
                      बागेत कोठेही आता मधुमास नाही राहिला   

                      नव्हतीस तू येथे तुझा आभास तेंव्हा व्हायचा
                      आलीस तू आता तुझा आभास नाही राहिला   

                      कुठलेच माझे बोलणे मानीत नाही मी खरे 
                      माझ्यावरी माझा आता विश्वास नाही राहिला   

                      शोधू अता 'खावरमला मी कोणत्या ग्रंथामधे
                      बखरीतल्या  गप्पांमधे इतिहास नाही राहिला

खावर यांनी गझलेचे तंत्र चांगल्या प्रकारे सांभाळले आहे.आशयाभिव्यक्ती सहजतेने व प्रभावीपणाने झाली आहे.  खावर यांच्या गझलांमध्ये तांत्रिक निकषांच्या परिपूर्तीसाठी आशयाभिव्यक्तीमध्ये तडजोड केलेली कुठेही दिसत नाही. विषयवैविध्य देखील चांगल्याप्रकारे असल्याचे दिसून येते.

                    कुणी गर्दीत या दु:खी जराही व्हायचे नाही
                     हरवलो मी तरी कोणी मला शोधायचे नाही

                     तुझ्या गठडीत राहू दे तुझे आदर्श हे सारे
                     तुझ्या मुलुखातले नाणे इथे चालायचे नाही      

                       कशी संपेल ऐशाने तुझी-माझी लढाई ही
                      तुला हारायचे नाही, मला जिंकायचे नाही

                 
                      असे हे रान जादूचे इथे आल्यावरी 'खावर'
                       कुणाला रान हे सोडून जाता यायचे नाही   

माणूस हा जगाविषयी जितका अनभिज्ञ असतो तितकेच जगही माणूस हा जगाविषयी जितका अनभिज्ञ असतो तितकेच जगही त्याच्याविषयी अनभिज्ञ असते. जगच नव्हे, तर माणूसही   स्वत:विषयी बराचसा अनभिज्ञ असतो. ही अनभिज्ञता परिभाषेच्या पलीकडची असते. स्वत:च्या स्वत:बद्दलच्या अनभिज्ञतेची जाणीव माणसाला होऊ लागते तेव्हा त्याचा स्वत:विषयीचा शोध सुरु होतो.  स्वत:चा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जगण्यातील उन्हे आणि सावल्या यांचाही शोध घेणे क्रमप्राप्त होते. ज्यांना उन्हाचा शोध लागतो, त्यांना उन्हाचे चटके बसत नाहीत. कारण ऊन-सावल्यांप्रमाणे स्वत:च्या आत्मभावात बदल करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आपोआप विकसित होत जाते. उन्हाचे अर्थबोध सावल्यांच्या परिभाषेत करण्याचे कामही सोपे नसते यासाठी उन्हे आणि  सावल्या दोन्हींचा जवळून परिचय असावा लागतो.  

                           हजार दु:खे मनात माझ्याहजार जखमा उरात माझ्या
                           वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या

                            तुझ्याविनाही जगावयाचे जरी इथे शेकडो बहाणे 
                            असे खरा रंग जीवनाचा तुझ्यामुळे जीवनात माझ्या  

                            समोर मृत्यू उभा तरीही नसे तुझे वेड सोडले मी
                            तुझीच गाणी अजून असती थरारणाऱ्या स्वरात माझ्या

                            गरीब मी दान तारकांचे कुठून या काजळीस देऊ?
                            उगीच  'खावरउभी असे ही निशा अशी अंगणात माझ्या     

गझल ही जशी प्रेमाराधाना,सौंदर्याचा शृंगार,शृंगाराचे सौंदर्य  आहे,तशीच ती वेदनांचा
 देखील शृंगार आहे. म्हणूनच वेदनांच्या सौंदर्याचा शोध हा गझलेचा एक पैलू आहे. 
ज्याला वेदनेचे सौंदर्य उमगले,त्याला वेदना उमगली आणि ज्याला वेदना उमगली त्याला 
गझल उमगली.       

                           रोशनीचे कायदे पाळायचे
                           रात्र आली कि दिवे जाळायचे
                           रक्त डोळ्यातून नाही येत का?
                           सारखे अश्रू किती ढाळायचे     

                             राहिली ही दोन शब्दांची कथा
                             काय आता यातले गाळायचे

                            खूप झाली पुस्तके 'खावरअता 
                             माणसांचे चेहरे चाळायचे   

काव्यातील संपृक्तता ही कोणतीही काव्यनिर्मिती सशक्त होण्यासाठी गरजेचे असते.
 कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय  व्यक्त करणेहे गझलेची परिणामकारकता 
वाढवण्यासाठी आवश्यक असते. शिवाय गझलेतील प्रत्येक शेर चांगला कसा होईलयाकडे लक्ष द्यावे लागते. अचूक शब्दयोजनामुळे आशय नेमकेपणाने 
व्यक्त होतो. त्यामुळे शेर प्रभावी बनतो. तसेच तंत्राची योग्य परिपूर्ती करण्यासाठी देखील शब्दयोजन योग्य असणे गरजेचे असते.  गझलेचा एखादा शेर जरी ऐकवला तरी तो एकाच शेर एखाद्या स्वतंत्र कवितेचा प्रत्यय देणारा वाटतो.
               
                           निर्झरांनी टाकले नि प्यास जेव्हा वाढली
                           आसवे 'खावर' मला माझी गिळावी लागली   

खावर यांच्या गझल लेखनामध्ये गैरमुसलसिल  गझलांचे प्रमाण अधिक आहे. या प्रकारामध्ये विविध विषय असलेले शेर एकाच गझलेमध्ये समाविष्ट केलेले असतात. त्यामुळे गझलेचे सौंदर्य वाढते आणि ती एक वैशिष्ट्यपूर्ण काव्याविष्कार बनते.

                         सिद्धार्थही  झालोमी बुद्ध ही न झालो 
                         सोडून राजवाडा नाहक वनात आलो   

                           माझ्याविरुद्ध खावर फिर्याद मीच केली
                           घेवून मीच मजला न्यायालयात आलो

 २७ सप्टेंबर १९९० रोजी हा जिवंत मनाचा कवी-गझलकार कालवश झाला.बदीउज्जमान 'खावरयांचे निधन होऊन वीस वर्षे होऊन गेली तरी त्यांच्या गझलेतील ताजेपणा
 तसाच कायम आहे. खावर यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. त्यांच्या 'गझलात रंग माझा (१९८५),
'माझिया गझला मराठी'(१९८६),'चार माझी अक्षरे'(१९९८),या तीन गझलसंग्रहांशिवाय
'खावर' या नावाचा त्यांच्या समग्र मराठी गझलांचा संग्रह 'गझल सागर प्रतिष्ठानमुंबई'
 यांच्यातर्फे  प्रकाशित करण्यात आलेला आहे. याशिवायहुरुफ'(१९७२),
'मेरा वतन हिंदोस्ताँ'(१९७३),   'बयाज'(१९७३), 'अमराई'(१९७६),   'लफ्जों की पैरहन'(१९७७),'सात समंदर'(१९८२), 'नन्ही किताब'(१९८३),'मोती-फूल-सितारे'(१९८४), 'सब्जों ताजा निहालों के अंबोह मे' (१९८६) हे उर्दू कवितासंग्रह प्रकाशित आहेत.  या व्यतिरिक्त 
त्यांनी मराठी कवितांचा उर्दूमध्ये अनुवादही केला आहे. त्यात 'खुशबू',(१९७४),'सबील' (१९७८), 'मराठी रंग'(१९८५),'दिनार'(१९८१),'निले पहाड की नज्मे'(१९८६) इत्यादी पुस्तकांचा समावेश 
आहे. 'खावरयांच्या साहित्यसेवेला 'इम्तियाझे मीर सनद' या उर्दूतील मोठ्या पुरस्कारासह
 भारत सरकार,महाराष्ट्र  सरकार आणि इतर तब्बल १४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी मराठी कथांचा उर्दूत आणि उर्दू कथांचा मराठीत अनुवाद देखील केला आहे.
                                      

                                                                      --------------adv. amol waghmare